Tuesday 10 September 2013

4 – ‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध



कवितेचे विद्यालय –
4 – ‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध
घड्याळात तास, मिनीटे व सेकंद असतात. तसेच मराठीत शब्द, अक्षरे व व्यंजन-स्वर असतात. साठ सेकंदाचे मिनीट होते. चौतीस व्यंजने आणि बारा स्वर यातून अक्षरे बनतात. वेळ दाखविणारी अनेक कंपन्यांची असंख्य घड्याळे आहेत. तसेच मानवाच्या बर्‍याच भाषा आजही अस्तित्वात आहेत. खेळांच्या स्पर्धात वापरले जाणारे ‘स्टॉपवॉच’ सेकंदाच्या हजाराव्या भागाची नोंद करू शकते. सेकंदाची व्याख्या अचूकतेने देण्यासाठी मानवाने ऍटॉमिक-क्लॉक (अणूंत होणार्‍या कंपनांचा वापर केलेले घड्याळ) बनवले. ‘‘‘Since 1967, the International System of Units (SI) has defined the second as the duration of 9192631770 cycles of radiation corresponding to the transition between two energy levels of the caesium-133 atom’’’ अशी सेकंदाची व्याख्या आहे. त्यामुळे ऍटॉमिक-घड्याळे (ऍटोमॅटीक नव्हेत) किती अचूक वेळ दाखवितात? त्यासाठी ‘‘‘it would neither gain nor lose a second in 20 million years!’’’ असे म्हटले जाते. काय आहे की नाही सायन्सची कमाल! ‘कवितेचे विद्यालय’ या परिसरात या गोष्टी कशासाठी?, हा आपल्याला प्रश्न पडला असेल. याचे अतीशय सुयोग्य व उपयुक्त कारण आहे आणि ते मानवाच्या काव्य क्षेत्रासाठी सर्वसमावेशकता देणारे ठरणार आहे. व्यंजन-स्वर यातून बनलेले अक्षर जेवढे सुक्ष्म, तेवढे त्यातून मानवाला ओळखता येणारी ध्वनीची जाण, नैसर्गिकतेला गाठता येईल एवढी सुक्ष्मतम ठरते, परिपूर्णपणे भाषेतून वापरता येते. मराठी भाषा एवढी सक्षम आणि सुक्ष्मतेतून भव्यतेकडे झेपावणारी आहे. होय, आपण हेच ‘कवितेचे विद्यालय’ यातून अभ्यासणार आहोत.

वेळ मोजण्यासाठी ‘सेकंद’ हा कालमापनाचा छोटा भाग (युनीट) आपण वापरतो. आजवर इतर भाषांनी कवितेतील लयबद्ध अक्षररचनेतील उच्चार-वेळेचे मापन करण्यासाठी ‘लघु-गुरू’ हे प्रमाण वापरले. कारण त्या भाषांना केवळ एवढ्याच सुक्ष्मतेपर्यंत पोचण्याचे स्वाभाविक योगदान अवगत आहे. जरी मराठीनेही आजवर ‘लघु-गुरू’ हेच प्रमाण वापरले असले तरी मराठीचे कळत नकळत वापरता येणारे स्वाभाविक योगदान बरेच सुक्ष्म आहे. मराठी व्यक्तिच्या मेंदूत अक्षर स्थिरावताना हे आपोआप घडते. यातील सर्व बारकावे आपण क्रमाक्रमाने पडताळून बघणार आहोत. केवळ तुमच्या स्वर-यंत्र ते ओठ या निसर्गाने दिलेल्या उच्चाराच्या प्रयोग शाळेचा वापर करून, मराठी व्यक्ति ते जाणून घेऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही संदर्भ ग्रंथाची आवश्यकता नाही. म्हणजेच सर्वच घड्याळे वेळ दाखवितात पण ऍटॉमिक-घड्याळे जास्त अचूक वेळ दाखवितात तसेच इतर भाषांतून कवितेची जाण निर्माण होते पण मराठीतून कवितेची सुक्ष्मतम जाण निर्माण होते. मराठी ही जणू अत्याधुनिक युगातील ‘ऍटॉमिक-भाषा’ ठरते!

‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध निश्चित करताना प्रथम आपण फिजिक्स मधला साऊंड काय म्हणतो ते थोडक्यात पाहू. मानवाला अंदाजे 85 ते 1100 फ्रिक्वेन्सीचा ध्वनी उच्चारता येतो आणि अंदाजे 20 ते 20000 फ्रिक्वेन्सीचा ध्वनी ऐकू येतो. हे सायन्सने सिद्ध केले आहे. यातील 1/20 सेकंद (0.05 सेकंद) हा भाग मानवाला ऐकू येणारी ध्वनीतील ‘ग्रहण-क्षमता’ (Reception ability) दर्शवतो आणि 1/20000 सेकंद ( 0.00005 सेकंद) हा भाग मानवाला ऐकू येणार्‍या ध्वनीतील ‘धारण-क्षमता’ (Retention ability) दर्शवतो. यातील 1/20 सेकंद (0.05 सेकंद) या कालमापनाला आपण या लेखापुरते ‘क-वेळ’ असे नाव देऊ.

सिनेमा दाखविताना चित्र आणि ध्वनी यांची सांगड घालताना प्रत्येक चित्राच्या 24 फ्रेम एका सेकंदात पुढे पुढे सरकतात. जेव्हा ती एक फ्रेम क्षणभरासाठी स्थिर राहते तेव्हा त्यातून प्रकाश जाऊन आपल्याला दिसण्याची क्रिया घडवली जाते. त्यामुळे स्थिर-चित्रांतून आपणास चलत-चित्रपट आभास होतो, नव्हे जणू तसे आपल्याला दिसते. कवितेचा संबंध दिसणार्‍या गोष्टीशी नसून उच्चार-वेळेशी असतो. पण चलत-चित्रपटात वापरलेला क्षणभराचा, ‘चित्र स्थिर राहण्यासाठीचा वेळ’, कमीतकमी वेळेचे ज्ञान होण्याच्या आपल्या ‘जाणीवांच्या आकलनाशी’ निगडीत असतो. म्हणजे तो अंदाजे वेळ 0.05 सेकंद (1/24 = 0.04166 चा जवळचा अंक) म्हणता येतो. पुन्हा याचा संबंध ‘क-वेळ’ याच्याशी जुळतो, हे लक्षात येते.

पुर्वी गाण्याच्या रेकॉर्डस मिळत त्या 35 वा 45 RPM (Revolution Per Minute) च्या असत. म्हणजे ध्वनीचे रेकॉर्डींग ज्या वेगाने केले आहे त्याच वेगाने ध्वनी प्रसारीत करणार्‍या यंत्राचा वेग असला की रेकॉर्ड केलेला ध्वनी जशाच्या तसा प्रक्षेपीत करता येतो.

भाषेतील सर्वात कमीवेळेत संपणारा आणि निश्चितपणे ऐकू येणारा उच्चार ‘व्यंजन’ ठरतो. आधुनिक युगात वेळेच्या प्रमाणाला आपण ‘सेकंद’ म्हणतो. आता आपण ‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध निश्चित करू. ‘रॅप’ पद्धतीतून जलद उच्चार होऊ शकतो आणि माननिय वाजपेयींच्या भाषणाच्या संथ गतीतूनही (माननिय वाजपेयींची क्षमा मागतो) उच्चार होतो. तेव्हा उच्चारातील ‘व्यंजन’ या वेळेची सर्वसमावेशकता लक्षात घेणे गरजेचे ठरते. वयोमान, लिंग-भेद, उंची, जाडी, शारीरिक ठेवण, वजन, स्थळ, ठिकाण, दिवस-रात्र, महिने-वर्ष, उष्णता-थंडी, आराम-कष्ट, सुदृढ-अशक्त, टवटवीत-थकलेला, संवादातील गरज, भावनेचा अविष्कार, वगैरे भिन्न परिस्थितीचा विचार करून ‘व्यंजन’ आणि ‘सेकंद’ यांचा परस्पर संबंध काहीसा निश्चित करणे गरजेचे ठरते.

‘निमेष’ हे कालमापनाचे भारतीय परंपरेचे प्रमाण आहे. एक निमेष म्हणजे पापणी लवण्यास लागणारा अंदाजे वेळ होय. भारतियांनी वेळेच्या प्रमाणाची आखणी अशी नैसर्गिकपणावर बेतली आहे. अर्थात यात सेकंद एवढी निश्चितता व अचूकता नाही. गद्य, पद्य व संगीत यांच्या योगदानाचा मार्ग मोकळा होणारे, ‘निमेष’ हे वेळेचे प्रमाण ‘लघु-गुरू’ पेक्षा बरेच सुक्ष्म आहे, असे म्हणता येते.

निमिष या वेळेच्या प्रमाणाबाबत बरीच भिन्न कालावधीची कोष्टके भारतीय संस्कृतीतून सापडतात. (1) भारतीय ज्योतिषशास्त्राचा संबंध घेतला तर एक निमेष म्हणजे अंदाजे 4/45 सेकंदाचा (0.08888 सेकंद) वेळ ठरतो. (2) भारतिय संगीतग्रंथांचा संबंध घेतला तर एक निमेष म्हणजे अंदाजे 1/32 सेकंदाचा (0.03125 सेकंद) वेळ ठरतो. हा फरक फारच मोठा आहे. (3) नाट्य-शास्त्रानुसार एक निमेष म्हणजे अंदाजे 1/25 सेकंदाचा (0.04 सेकंद) वेळ ठरतो. (4) नाडीचे ठोके यावरून भारतीय ग्रंथातून मांडलेल्या व्याख्येप्रमाणे एक निमेष म्हणजे सरासरी 1/18 सेकंदाचा (0.0555 सेकंद) वेळ ठरतो. कृपया ज्योतिष, संगीत, नाट्य आणि नाडी अशा शास्त्रांच्या गरजा भिन्न असतात आणि त्यानुसार ‘निमिष’ या वेळेच्या प्रमाणाची मांडणी भिन्न सांगितलेली आहे, हे लक्षात घ्यावे. यात सांगितलेल्या गणितांचा आधार ग्रंथांतून मिळतो.

इतर भाषांपेक्षा सुक्ष्मतम ठरणार्‍या ‘निमिष’ या वेळेच्या प्रमाणाची, ‘लघु-गुरू’ पेक्षा कितीतरी सुक्ष्म ठरणारी, मराठीतील पुढे दिलेली सुत्रे, सर्वसमावेशकाची भुमिका घेणारी ठरतात. ‘सेकंद’ हे वेळेचे आणि ‘लघु-गुरू’ हे ओळीच्या कालमापनाचे आजवरचे सुत्र आपण जाणतो. आता मराठी सादर करत आहे, कवितेच्या ओळींचे सुक्ष्मतम सुत्र. त्याचे नाव आहे ‘व्यंजनकाल’. व्यंजनाच्या उच्चाराला लागणारा वेळ म्हणून याचे नाव ‘व्यंजनकाल’ आहे. सोबतच्या तक्त्यात लघु-अक्षर-काल मांडला आहे. लघु-अक्षर-काल यात ध्वनी आणि विराम दोघांचे वास्तव्य असते. विरामाच्या कोंदणात वावरणार्‍या लघु-अक्षरात साधारणपणे पाच ‘व्यंजनकाल’ असतात. अत्याधुनिक जगतात ध्वनीचे सर्वात सुक्ष्मतम रूप भाषेतून वापरणारी भाषा जागतिकीकरणात जगावर राज्य करणार आहे. मराठीची आजवर सामोरी न आलेली अद्धितीयता, अनोखे वैभव आणि विलक्षण अत्याधुनिकता ‘कवितेचे विद्यालय’ मधून सामोरी येईल असा विश्वास वाटतो.

आपला अभिप्राय देत चर्चेसाठी https://www.facebook.com/groups/togangal/ या ग्रुपवर सामिल व्हावेत ही विनंती.
आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल gangal@gmx.com

3 – अक्षर उच्चाराचे प्रमाण ‘मराठीतील व्यंजन’



कवितेचे विद्यालय –
3 – अक्षर उच्चाराचे प्रमाण ‘मराठीतील व्यंजन’

ध्वनीचा उच्चार आपण मुखातून करतो आणि कानांनी तो ऐकू येतो. या श्राव्य आणि मौखिक ध्वनीतले सुक्ष्मतम भाग मराठीने अक्षरातल्या व्यंजन-स्वरांमध्ये स्विकारले आहेत. व्यंजनांची निर्मिती ‘स्पर्श, अंतस्थ, उष्मे, महाप्राण, घर्षण’ अशा वर्णनातून व्यक्त होणार्‍या आघातातून होते. यात मुखातील ‘ओठांचा ओठांशी’ वा ‘जिभेचा टाळूशी’ वा ‘हवेच्या स्फोटासाठी केवळ जिभेचा’ (‘ह’ व्यंजनासाठी) असा वापर होतो. झालेल्या अशा एकाच आघातातून मराठीतील व्यंजने साकारतात. तसेच ऐकू येणार्‍या मराठी व्यंजनातील ध्वनी हा केवळ एकाच ‘जातीगुणवैशिष्ट्या’चा असतो. ‘जातीगुणवैशिष्ट्य’ म्हणजे ध्वनीतील असा गुणधर्म जो ध्वनीच्या ‘उच्च-नीचता’ (Frequency), लहान-मोठेपणा (Loudness), उच्चाराने घेतलेला वेळ (Duration of Time), यांच्याशी संबंधीत नसतो. ‘जातीगुणवैशिष्ट्य’ म्हणजेच ध्वनीतील खास खुबी, विशेष गुण, विशिष्ट लक्षण, आवाजाची पोत (Trait of Sound) होय. मराठीने स्विकारलेल्या ध्वनीतील खास ‘जातीगुणवैशिष्ट्यां’ना व्यंजन व स्वर नावांने आपण ओळखतो.

उच्चारीत ध्वनीपैकी अक्षरातल्या व्यंजनाचा उच्चार सर्वात कमी वेळेत संपतो आणि तो ऐकू सुद्धा येतो. तुम्ही ‘प, का, तो’ श्वास टिकेपर्यंत लांबलचक उच्चारा. त्यातील केवळ ‘अ, आ, ओ’ स्वर लांबवता येतात. त्यातील ‘प्, क्, त्,’ व्यंजने केवळ क्षणभर टिकतात. सर्व व्यंजने केवळ क्षणभर टिकतात तरीही त्यांची भिन्न ओळख आपल्याला होते. म्हणजेच ‘क्षणभर टिकणे’ या उच्चाराने घेतलेल्या वेळेमुळे व्यंजनाची ओळख होत नाही. व्यंजनाची ओळख मानवाला त्या ध्वनीतील खास खुबी, विशेष गुण, विशिष्ट लक्षण, आवाजाची पोत (Trait of Sound) म्हणजेच ध्वनीतील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ यामुळे होते. तुम्ही ‘प, का, तो’ श्वास टिकेपर्यंत लांबलचक उच्चारलात. समजा हा श्वास टिकेपर्यंतचा लांबलचक उच्चार ‘क्ष’ सेकंदाचा झाला. म्हणजे त्यातील ‘अ, आ, ओ’ स्वर हे समान ‘क्ष’ वेळेत उच्चारले गेले, असे समजू. उच्चारातील ‘क्ष’ कालावधी ही स्वराची ओळख ठरत नाही. स्वराची ओळख सुद्धा मानवाला त्या ध्वनीतील खास खुबी, विशेष गुण, विशिष्ट लक्षण, आवाजाची पोत (Trait of Sound)  म्हणजेच ध्वनीतील ‘जातीगुणवैशिष्ट्य’ यामुळे होते. व्यंजन-स्वर हे ध्वनीतली खास ‘जातीगुणवैशिष्ट्ये’ ठरतात. ‘अक्षर’ आणि ‘अक्षराने घेतलेला उच्चारातील वेळ’ हे दोन भिन्न घटक वा दोन तटस्थ गोष्टी आहेत.

मराठी भाषा ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन, अर्थ’ यांची जडणघडण ‘मराठमोळी’ लिपीतून अतिशय शास्त्रीयपणे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वात सुक्ष्मतेने वापरते. मराठीतील व्यंजनात केवळ एकच ‘जातीगुणवैशिष्ट्य’ असते. मराठीने ‘चमचा’ शब्दातल्या उच्चारातील ‘च्’ व्यंजन स्विकारले आहे. मराठीने संस्कृतच्या ‘चाणक्य’ शब्दातल्या ‘च्य्’ उच्चाराचे व्यंजन स्विकारलेले नाही. ‘चाणक्य’ शब्दातील ‘च्य्’ उच्चारात सुरवातीला ‘चमचा’ शब्दा मधल्या ‘च्’ व्यंजनातले ‘जातीगुणवैशिष्ट्य’ असते जे शेवटी नसते. तसेच ‘चाणक्य’ शब्दातील ‘च्य्’ उच्चाराच्या शेवटी, ‘ययाती’ शब्दा मधल्या ‘य्’ व्यंजनातले ‘जातीगुणवैशिष्ट्य’ असते जे सुरवातीला नसते. म्हणजेच संस्कृतच्या ‘च्य्’ व्यंजनात दोन ‘जातीगुणवैशिष्ट्य’ असतात. मराठीत ‘च्यायला’ शब्द आहे आणि तो ‘च्य’ असा लिहीला जातो. या ‘च्य’चा उच्चार संस्कृत मधल्या ‘चाणक्य’ शब्दातील ‘च्’ (च्य्) सारखाच मराठीत होतो. आजवरच्या चुकीच्या मराठी-पुस्तकी-व्याकरणाने ‘संस्कृतातून मराठीत बरेच शब्द जसेच्या तसे आले’ असे घोषीत केल्याने मराठीची प्रचंड आबाळ, मानहानी, निंदा, अवहेलना झालेली आहे. यापुढे तरी मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून केवळ मराठीपुरताच विचार करून मराठीने स्वतःच्या लिपीचे नाव ‘मराठमोळी’ असे जाहीर करून स्वतंत्र झाले पाहीजे.

मराठीतील ‘व्यंजन’ म्हणजेच ध्वनीतील केवळ एकच ‘जातीगुणवैशिष्ट्य’ हे यापुढे कृपया नीट लक्षात ठेवावे. त्यामुळे जोडाक्षराची मराठीतील व्याख्या अधिक शास्त्रीय आणि अचूक ठरते. ज्या अक्षर उच्चारात स्वराच्या उच्चाराआधी एकापेक्षा जास्त ‘व्यंजने’ असतील त्यांना मराठीत जोडाक्षर म्हटले जाते. त्यामुळे मराठीत ‘च्य’ हे जोडाक्षर ठरते, व्यंजन नाही. मानवाला स्वराच्या आधी जास्तीतजास्त केवळ चार ‘व्यंजने’ उच्चारता येतात. सोबत मराठी जोडाक्षरांच्या ‘जडणघडणी’चा तक्ता दिला आहे. यात केवळ ‘र्’चा उच्चार जोडाक्षरात प्रथम केल्यास, दोनदा करणे (केवळ दर्शवणे) शक्य आहे हेही कळेल. म्हणजे अशा वेळी जणू चार व्यंजने जोडाक्षरात भाग घेऊ शकतात!

अक्षरात एकच व्यंजन एकानंतर एक येऊन ‘प्प, क्क, च्च’ असे जोडाक्षर बनते. लेखनातून ‘प्प, क्क, च्च’ अशी जोडाक्षरे सुचवली जातात. यांचा उच्चार करताना मात्र आपण नक्की काय करतो? ते लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही ‘अपाअपा’ उच्चारा. आता ‘अप्पाअपा’ उच्चारा. यातील ‘प्पा’ उच्चारताना त्यातील ‘प्’ हे व्यंजन ओठांची हालचाल करून दोनदा उच्चारले जात नाही. ‘प्’ व्यंजनात अडकलेले वा गुंतलेले ओठ तसेच जास्त वेळ स्थिर ठेवून ‘प्’ व्यंजनाचा दोनदा उच्चार झाल्याचे आपण घडवतो वा सुचवतो. ‘प्’ या एका व्यंजनाला लागणार्‍या उच्चार वेळेच्या दुप्पट वेळ केवळ यात खर्च केला जातो. त्यातून ओठांची दोनदा हालचाल करून ‘प्’ व्यंजन दोनदा न उच्चारता ‘प्प्’ साकारले जाते. अशा लेखांतून ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन, अर्थ’ यांचा परस्पर संबंध यातून स्पष्ट होत जाणार आहे.

मुलांना शिकवताना ‘प्’ हे व्यंजन वापरा. त्यामुळे मुलांना ओठांची हालचाल दिसते आणि कळते. त्यानंतर ‘क’ व ‘क्क’, ‘ट’ व ‘ट्ट’ अशा उच्चारातून जिभेची हालचाल ‘क्क’ आणि ‘ट्ट’ या जोडाक्षरात कशी एकाच जागी स्थिर राहते, ते त्यांचे त्यांना जाणवेल. कशी गम्मत आहे की नाही? पण हे असेच घडते, हे तुम्ही उच्चार करून, सिद्ध झाल्याचे घोषीत करू शकता. मराठीची जडणघडण अशा सहजसुलभतेने पटवता येते. टप्प्या टप्प्यातून आपण हेच घडवणार आहोत.

आता मराठीतील ‘र्‍य’ आणि ’र्य’ या जोडाक्षरांकडे वळू या. संस्कृतमध्ये आणि हिन्दी मध्ये ‘र्‍य’ नाही. मराठीतील हा दोष आहे असे मला सुद्धा लहानपणी संस्कृत-प्रचूर शिक्षकांनी सांगितले होते! पण संशोधनातून मराठीचे विलक्षण शास्त्रीय रूप सामोरे आले. ज्याप्रमाणे ‘पा’ नंतरच्या ‘प्पा’ उच्चारात जिभ केवळ जास्त वेळ ‘प्’ व्यंजनाच्या जागी स्थिर राहते तसेच ‘र्‍य’ मधल्या ‘र्’चा उच्चार ‘र्+य्+अ’ असा होतो पण ‘र्य’ मधल्या ‘र्’ चा उच्चार ‘र्+र्+य्+अ’ असा होतो हे लक्षात येईल. यात ‘र्’ उच्चारात गुंतलेली जिभ तेथे जास्तवेळ स्थिर राहते हे लक्षात येईल. ‘र्’ हे मृदू व्यंजन आहे. हा उच्चार जिभेने मध्यटाळूशी केलेल्या हळूवार अलगद स्पर्शाने साध्य होतो. योग्य ठिकाणी जिभ नेऊन नाजूकपणे हलकासा स्पर्श मध्यभागात टाळूला करून तो तसाच स्पर्श स्थिर ठेवणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नाही (!), हा असा उच्चार केवळ मराठीलाच जमतो ! ! काशीचे संस्कृत पंडीतही मराठी व्यक्तीकडून संस्कृतचे उच्चार अचूक होतात, असे म्हणतात. उगाच नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही गागा भट्टाला बोलावले गेले!

या लेखातून एक महत्त्वाचा टप्पा आपण गाठला आहे. अक्षरांच्या उच्चारात व्यंजनाचा उच्चार ‘सर्वात कमी वेळेचा व निश्चित’ असतो, हे यातून सिद्ध होते. स्वराचा उच्चार श्वास टिकेपर्यंत लांबवता येतो म्हणून त्यातल्या उच्चार वेळेत ठोस निश्चितता नसते. पण अक्षरातील व्यंजनाचा उच्चार प्रत्येकवेळी केवळ क्षणभरच टिकतो आणि तो वाढवता येत नाही, हे निश्चितपणे कळते. म्हणजेच कोणत्या घटकावर अक्षरातील वेळेचे प्रमाण अवलंबून ठेवले पाहीजे ते निश्चित होते. उच्चार वेळेचे प्रमाण म्हणजे ‘मराठीतील व्यंजन’ होय. मराठीतील हे उच्चार वेळेचे प्रमाण ध्वनीतील केवळ एकाच ‘जातीगुणवैशिष्ट्या’तून साकारते. कारण स्वराच्या आधी येणार्‍या दोन ‘जातीगुणवैशिष्ट्यां’च्या उच्चारासाठी थोडा जास्त वेळ खर्च करावाच लागतो, हे आपण सिद्ध केले आहे.

कवितेतील ओळींनी घेतलेल्या उच्चारातील वेळेचे मापन करण्यासाठी केवळ, निव्वळ आणि फक्त मराठी व्यंजनाचाच उपयोग, जगातील सर्व भाषांना करावा लागणार आहे. ही आहे मराठीतील शास्त्रीयात आणि सर्वसमावेशकता. यातून टप्प्या टप्प्यातून मराठी भाषेचे सार्वभौमत्व नक्कीच सिद्ध होईल असा मला विश्वास वाटतो.

आपला अभिप्राय व्यक्त करून चर्चेसाठी https://www.facebook.com/groups/togangal/ या ग्रुपवर सामिल होणार का?
आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल – gangal@gmx.com

2 – मराठी गद्य-पद्य आणि अक्षर उच्चारातील वेळ



कवितेचे विद्यालय –
2 – मराठी गद्य-पद्य आणि अक्षर उच्चारातील वेळ

गद्य आणि पद्य हे दोन भिन्न शब्द आहेत आणि त्यांचा अर्थही भिन्न आहे. गद्यात वाक्ये असतात आणि पूर्णविरामाने त्यांचा शेवट होतो. पद्यात ओळी असतात. पद्यातील ओळी ठराविक कालावधीत संपणार्‍या उच्चार वेळेवर अवलंबून असतात. ओळीने उच्चारासाठी घेतलेला लयबद्ध वेळ हाच जणू त्या ओळीचा शेवट दर्शविणारा ‘पुर्णविराम’ ठरतो. म्हणूनच ‘पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय’ असे माननीय प्रा. माधव त्रिं. पटवर्धन (माधव ज्युलियन) यांनी त्यांच्या ‘छन्दोरचना’ ग्रंथात म्हटले आहे.

मराठी भाषा सुक्ष्मतेकडून भव्यतेकडे झेपावणारी आहे, असे संत ज्ञानेश्वर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त संत झाले. केवळ महाराष्ट्रातच सर्वात जास्त संत का बरे निर्माण झाले? याचे कारण ‘मराठी भाषा’ आहे. काय खरे नाही वाटत? चला थोडा सारासार विचार करू. संत होण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टींची नितांत आवश्यकता असते, 1) आदर्श ठरणारी परीपक्व अध्यात्मकतेची जाण, 2) काव्यातून आपले विचार मांडण्याची कला. भाषा जर परीपूर्णपणे सक्षम असेल तर काव्यातून विचार मांडण्यासाठी ती सुयोग्य ठरते आणि तेच मराठीबाबत खरे ठरते. काव्यासाठी जगातील सर्वात परीपूर्णपणे सक्षम ठरणारी भाषा मराठी आहे. ही केवळ मराठीच्या प्रेमामुळे लिहीलेली वाक्यरचना नाही. आपण ‘कवितेचे विद्यालय’ या भागातून हे पुराव्यानिशी स्पष्ट करून, सिद्ध करणार आहोत. यातील बराच भाग नव्याने मांडणी केलेला आढळेल, पण तेच खरे आणि सत्य आहे ना? पूर्णपणे मराठी आहे ना? हे सर्वांनी तपासायचे आहे.

अक्षराने उच्चारासाठी घेतलेल्या वेळेचे तीन भाग पडतात. वेगवेगळ्या भिन्न कारणांमुळे हे तीन भाग पडतात. ही सर्व कारणे पूर्णपणे नैसर्गिकपणावर म्हणजेच निसर्ग नियमांवर आधारलेली आणि मराठीने अंगिकृत केलेली, म्हणजेच मराठी भाषेच्या अंतरंगातील कणाकणात झिरपलेली आहे.  1) मराठी अक्षराचा शेवट स्वराने होतो आणि अक्षरातील स्वराचा उच्चार श्वास टिकेपर्यंत लांबलचक करता येतो. यामुळे मराठी स्वराचे आखुड, वाढीव आणि लांबडा असे तीन भाग पडतात. 2) स्वराच्या कमीतकमी वेळेत केलेल्या उच्चार वेळेचे र्‍हस्व आणि दीर्घ असे दोन भाग पडतात. हे निसर्गाने मानवावर लादलेले उच्चार-वेळेचे तंत्र आहे. 3) मराठी भाषेतील व्यंजन आणि स्वर सुक्ष्मतम ठरतात. यामुळे प्रत्येक अक्षरातील स्वराचा अपुरा, नियमीत आणि लांबट उच्चार होतो. हा भाग मराठी भाषकांच्या उच्चारातून आपोआप निर्माण होतो.

आजवर मराठीचे असे शास्त्रीयतेने अभ्यासपूर्वक विश्लेषण करून गटवारीतून ते स्पष्ट केले गेले नाही. यातील काही भाग जणू मराठीतील काही तृटी वा कमतरता वा चुका म्हणून संबोधल्या गेल्या. मराठीच्या लिपीला ‘मराठमोळी’ असे नाव देऊन, मराठीचा मराठीसाठी मराठीपुरताच मराठीपणातून विचार करून मराठीची जडणघडण मांडणे यासाठीच अतिशय महत्त्वाचे ठरते.
इतर भाषांना काव्यासाठी अक्षर उच्चारातील केवळ लघू-गुरू ही संकल्पना वापरता आणि अवलंबिता आली. अक्षराच्या लघू उच्चाराला एक आणि अक्षराच्या गुरू उच्चाराला दोन असे अंक देऊन कवितेच्या ओळीतील अक्षर उच्चाराने घेतलेला एकूण वेळ जाणणे इतर भाषांना जमले. यापेक्षा कवितेच्या ओळीतील अक्षर उच्चाराने घेतलेल्या एकूण वेळेबाबत, अधिक सुक्ष्मतेची जाण, मराठी भाषा आपसूकपणे करून देते. होय हे सत्य आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील संतांनी आपापल्या विचारांची मांडणी भिन्न काव्य पद्धतींतून व्यक्त केलेल्या आढळतात.

इतर भाषांनी अक्षर उच्चाराने घेतलेल्या एकूण वेळेबाबत वापरलेले काव्य-परिमाण (काव्यातील अक्षर-उच्चार-वेळ मोजण्याचे प्रमाण) लघू-गुरू यावरच मर्यादीत असते. मराठीला मात्र हेच प्रमाण (अक्षर-उच्चार-वेळ मोजण्याचे साधन) ‘व्यंजनाने घेतलेल्या वेळेवर’ बेतता आले आहे.

उदाहरण - तुम्ही ‘प, का, हो’ ही अक्षरे श्वास टिकेपर्यंत लांबलचकपणे उच्चारा. त्यातील व्यंजनाचा उच्चार वाढवता येत नाही. व्यंजनाचा उच्चार केवळ क्षणभर टिकतो. हा जो क्षणभराचा काळ असतो त्याचा वापर ‘अक्षर-उच्चार-वेळ मोजण्याचे प्रमाण’ म्हणून मराठीला वापरता येते. प्रत्येक मराठी माणूस त्याच्याही कळत नकळत हे आपसूकपणे जाणतो, हे मराठीचे अद्वितीय असाधारण अनोखे वैभव आहे.

हा लेख ‘अक्षर उच्चारातील वेळ’ याबाबतची प्रस्तावना देऊन थांबवत आहे. कृपया आपण हा लेख आवडला का? याचे आटोपशीरपणे ‘होय’ वा ‘नाही’ असे कमीतकमी उत्तर द्यावे ही विनंती. शिवाय आपला अभिप्राय व आपले मत व्यक्त करून यात सहभागी झालात तर एकत्रीतपणे यातील योग्यता तपासणे शक्य होईल.
https://www.facebook.com/groups/togangal/permalink/193653567473096/?qa_ref=qd
आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल – gangal@gmx.com

1 – व्यंजन, स्वर, अक्षर आणि बाराखडी



कवितेचे विद्यालय –
1 – व्यंजन, स्वर, अक्षर आणि बाराखडी
कविता म्हणता येते. त्याला चाल देता येते. नियमित अंतरावर त्यातल्या ओळींचे तुकडे पडतात. कवितेतील ओळींना टाळी सुद्धा देता येते.
हे असे घडतेच कशामुळे?
याचा उलगडा मराठी भाषेतून अगदी साध्यासोप्या पद्धतीतून करता येतो.
कवितेच्या ओळीत काय असते?
कवितेच्या ओळीत असतात शब्द, शब्दात असतात अक्षरे.
मराठी अक्षरे म्हणजे नक्की काय?
अक्षरात असतात व्यंजन आणि स्वर. पण व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय करता येत नाही. म्हणून व्यंजनात त्यानंतर स्वर मिसळून बनतात मराठी अक्षरे. व्यंजनाला बारा स्वर लावून त्याची बनते बाराखडी. ‘प, पा, . . .’, ‘क, का, . . .’ अशा बनतात बाराखडी. स्वरांचा उच्चार तटस्थपणे करता येतो. म्हणून स्वर हे अक्षर ठरते. ‘अ, आ, . . .’ ही अक्षरे ठरतात.
बाराखडी म्हणजे नक्की काय?
मराठीत बारा स्वर आहेत. ‘अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऍ, ऑ’ ही आहे मराठीतील स्वरांची बाराखडी.
मराठीत चौतीस व्यंजने आहेत. प्रत्येक व्यंजनाला बारा स्वर लावून बारा अक्षरांची बाराखडी बनते. ‘प, पा, पि, पी, पु, पू, पे, पै, पो, पौ, पॅ, पॉ’ ही झाली ‘प’ची बाराखडी. अशी प्रत्येक व्यंजनाची बाराखडी बनते.
‘बाराखडीतून प्रत्येक अक्षराचा अचूक उच्चार कळतो व तो तसाच अचूकपणे करता येतो’, हा बाराखडीचा महत्त्वाचा सिद्धांत आहे.
स्वर-बाराखडीत एकूण 12 (बारा) अक्षरे आहेत. व्यंजन-बाराखडीत एकूण चारशे आठ अक्षरे आहेत (34 X 12 = 408). म्हणजे बाराखडीत एकूण चारशे वीस अक्षरे आहेत.
मराठी बाराखडीचा सिद्धांत –
‘‘‘‘मराठीच्या बाराखडीत स्वर-बाराखडी आणि व्यंजन-बाराखडी आहेत. बाराखडीतील प्रत्येक अक्षराचा शेवट स्वराने होतो, प्रत्येक अक्षराचा अचूक उच्चार कळतो, तो तसाच अचूकपणे श्वास टिकेपर्यंत लांबलचकपणे करता येतो आणि ‘मराठमोळी’ लिपीतील ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन व अर्थ’ या पाच गोष्टींना संलग्नपणे कार्यान्वित करतो.’’’’

या विषयाबाबतची एकत्रीत चर्चा ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या ग्रुपवर होत आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
https://www.facebook.com/groups/togangal/